Stray Dogs in Kolhapur:कोल्हापूर जिल्ह्यात ४० हजारांवर भटकी कुत्री, वर्षात ९० हजारजणांचा घेतला चावा

कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, सध्या ती ४० हजारांच्या वर पोहोचली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ३१ हजार कुत्र्यांचा समावेश आहे. गेल्या वर्
कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, सध्या ती ४० हजारांच्या वर पोहोचली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ३१ हजार कुत्र्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात या कुत्र्यांनी ९० हजार लोकांना चावा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे; मात्र आर्थिक अडचणी आणि प्रत्यक्ष अडथळ्यांमुळे प्रभावी उपाययोजना अद्यापही कमी पडत आहेत. करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे आणि या ठिकाणांना रेड झोन म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात एकट्या १० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे. आयसोलेशन रुग्णालय आणि मंगळवार पेठ येथील जनावरांच्या दवाखान्यात नसबंदीचे काम सुरू आहे, परंतु या प्रयत्नांना भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे अपयश येत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदने एक कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित करणे, नसबंदीकरण आणि लसीकरणाची माहिती गोळा करणे यांचा समावेश आहे. एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत किती नसबंदीकरण आणि लसीकरण झाले याचा अहवाल तयार केला जाणार आहे. याशिवाय, एबीसी आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र असलेल्या संस्थांची माहिती घेण्यात येणार आहे. कुत्र्यांच्या रेबिज लसीकरणाचा खर्च आणि त्याची दरपत्रक माहिती देखील या आराखड्यात समाविष्ट केली जाणार आहे.
करवीर तालुक्यातील उचगाव येथे ९७२, हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे ५६० आणि शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे ३५५ भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यांमध्ये तातडीने नसबंदीकरणाचे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, १३ नगरपालिका आणि नगरपंचायतींनी एकत्रितपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवर सामंजस्य करार करून या समस्येवर संयुक्तपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे, कारण या नागरी संस्थांच्या सभोवती ग्रामीण जनता आहे. त्यामुळे या समस्येवर एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करताना कचरा व्यवस्थापनाबाबतही जिल्हा परिषद आग्रही आहे. याबाबत नियोजन सुरू आहे, जेणेकरून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर एकत्रितपणे काम करता येईल. - डॉ. जॅसमिन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर



















