Jayakwadi Dam: जायकवाडीतून मोठा विसर्ग; अंबड-घनसावंगीतील कोणती गावे आहेत धोक्याच्या यादीत?

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. अवघ्या ११ दिवसांत धरणाचा जिवंत पाणीसाठा ३१ टक्क्यांवरून ९
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. अवघ्या ११ दिवसांत धरणाचा जिवंत पाणीसाठा ३१ टक्क्यांवरून ९३.४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला आहे. यामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या ३६ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी सुरुवातीला १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, नंतर बुधवारी दुपारी २८,१३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातील जिवंत पाणीसाठा ९३.४९ टक्के होता, तर पाणीपातळी १५२०.८१ फूट होती. याचवेळी धरणात सुमारे २४,५३१ क्यूसेक पाण्याची आवक सुरू होती. जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी बुधवारी दुपारी अंबड तालुक्यातील शहागड येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहोचले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. प्रशासनाने या पाण्याला गोदावरी नदीवरील विविध उच्च पातळीच्या बंधाऱ्यांमध्ये साठवण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे या भागातील सिंचनासाठी महत्त्वाच्या बंधाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी, रामसगाव, शेवता, बानेगाव, भोगाव, लिंगशेवाडी, सौंदलगाव, भादली, शिरसवाडी, राजाटाकळी, मंगरूळ, मुद्रेगाव, गुंज, उक्कडगाव, शिवणगाव, कोठी, पांढरे वस्ती, श्रीपत धामणगाव आणि आंतरवाली टेंभी या गावांचा समावेश आहे. अंबड तालुक्यातील गोरी, गंधारी, डोमलगाव, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव, वाळकेश्वर, कुरण, गोंदी, शहागड, पाथरवाला, हसनापूर, कोठाळा, इंदलगाव आणि साडेगाव या गावांतील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार सोमेश मोहिते यांनी नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे आणि शेतीची साधने सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. गोदावरी नदीवरील उच्च पातळीच्या बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठविल्यानंतर परिसरातील सिंचन व्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.



















