Phone Call Between Leaders:इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? महत्वाची माहिती समोर

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद होत आहेत. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद होत आहेत. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला काही काळ थांबवण्यात आले होते, परंतु त्यानंतर पुन्हा या संघर्षात वाढ झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला या संघर्षामुळे अडथळे निर्माण होत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. पश्चिम आशियात असलेल्या या तणावाचा फटका भारतासह अनेक देशांना बसत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेत पश्चिम आशियातील तणाव आणि भारत-इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. एएनआयने याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायलमधील विशेष धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. याशिवाय, दोन्ही देशांच्या हितासाठी विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याचा संकल्पही करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, “दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायल विशेष धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. तसेच दोन्ही देशांच्या परस्पर हितासाठी विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला,” असे म्हटले आहे. याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात इराण युद्धावर चर्चा झाली होती. या चर्चेत इराण युद्धावर तोडगा काढण्याबाबत तीन पर्याय चर्चिले गेले. या चर्चेत ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात ९० मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेत इराणबरोबर वाटाघाटी करून करार करण्याचा पहिला पर्याय, दुसरा पर्याय म्हणजे इराणभोवती नौदलाची नाकेबंदी कायम ठेवणे, आणि तिसरा पर्याय म्हणजे शांतता राखण्यासाठी मुत्सद्देगिरी करणे आणि अपयश आल्यास लष्करी हल्ले पुन्हा सुरू करणे यावर चर्चा झाली.













