Tragic Accident in Jalna:जालन्यात भीषण अपघात, दफनविधीहून परततांना कार विहिरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू

भोकरदन तालुक्यातील पारध-वालसावंगी रस्त्यावर पद्मावती गावाजवळ एक भीषण अपघात घडला. शुक्रवारी रात्री ८ वाजता, भरधाव वेगाने जात असलेल्या एका कारने अचानक रस्त्यालगत
भोकरदन तालुक्यातील पारध-वालसावंगी रस्त्यावर पद्मावती गावाजवळ एक भीषण अपघात घडला. शुक्रवारी रात्री ८ वाजता, भरधाव वेगाने जात असलेल्या एका कारने अचानक रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने दोन पुरुषांचे प्राण वाचवण्यात यश आले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धावडा येथील सुलताना बेगम जियाउल्लाखान (वय ४७) आणि अकतरबी (वय ७५) या महिलांसह त्यांचा मुलगा अबुताला जियाउल्लाखान (वय २२) आणि अल्तामश खान (सर्व रा. धावडा) हे चौघे दफनविधीसाठी सावंगी अवघडराव येथे गेले होते. दफनविधी आटोपून, हे चौघे कारने धावडा गावाकडे परतत असताना, पारध ते वालसावंगी रस्त्यावर पद्मावती गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पारध पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने अल्तामश खान व अबुताला यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कार आणि अकतरबी या विहिरीत होत्या. सुलताना बेगम जियाउल्लाखान यांना विहिरीबाहेर काढून बुलढाणा येथे नेले असता, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार विहिरीत असल्याने क्रेनच्या मदतीने गाडी आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे धावडा परिसरात शोककळा पसरली आहे.





















