Effects of Sugar on Skin: साखरेचे त्वचावर होणारे परिणाम

आरशात चेहरा पाहताना अनेकांना त्यांच्या त्वचेवरील बारीक सुरकुत्या आणि कमी झालेली चमक जाणवते. यावर उपाय म्हणून अनेकजण महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करतात; प
आरशात चेहरा पाहताना अनेकांना त्यांच्या त्वचेवरील बारीक सुरकुत्या आणि कमी झालेली चमक जाणवते. यावर उपाय म्हणून अनेकजण महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करतात; परंतु त्वचेशी संबंधित सर्वात मोठा धोका आपल्या आहारातच दडलेला असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त साखर त्वचेमध्ये कोलेजनच्या हानीकारक प्रभावामुळे त्वचेला निस्तेज बनवते. रक्तातील वाढलेली साखर त्वचेला घट्ट, लवचिक आणि तरुण ठेवणाऱ्या कोलेजन या महत्त्वाच्या प्रथिनाचे हळूहळू नुकसान करते. ही प्रक्रिया एक दिवसात होत नाही, तर अनेक वर्षे चालू राहते. त्यामुळे सुरुवातीला याचे परिणाम जाणवत नाहीत. तथापि, तिशी-चाळिशीनंतर त्वचेची चमक कमी होणे, त्वचा सैल पडणे आणि तिचा नैसर्गिक टवटवीतपणा हरवणे, अशी लक्षणे दिसू लागतात. याचा अर्थ असा नाही की, अधूनमधून मिठाई खाल्ल्याने त्वचेचे नुकसान होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षे साखरयुक्त पेये, मैद्याचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न खाण्याच्या सवयीमुळे साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते, जे हळूहळू त्वचेतील कोलेजनवर परिणाम करते. त्यामुळे आहारात छोटे छोटे बदल करून त्वचेला अधिक काळ ताजीतवानी ठेवता येऊ शकते. कोलेजन हे शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे. हे त्वचेला घट्टपणा, लवचिकता आणि नैसर्गिक चमक देण्याचे काम करते. वय वाढल्यावर शरीरात नैसर्गिकरीत्या कोलेजन तयार होण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या आणि सैल त्वचा दिसू लागते. तज्ज्ञांच्या मते, जास्त साखर खाण्याच्या सवयीमुळे कोलेजन निर्मितीची प्रक्रिया आणखी वेगाने खालावू शकते. त्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. मुंबईतील द स्किन टॉक क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. पूजा चोप्रा यांचे म्हणणे आहे की, जास्त साखर खाल्ल्यावर शरीर तिचा एक छोटा भाग ऊर्जा म्हणून वापरते, पण उरलेली साखर प्रथिनांना चिकटून राहते. या प्रक्रियेला ग्लायकेशन असे म्हणतात, ज्यामुळे एजीईज (Advanced Glycation End Products) नावाचे हानिकारक घटक तयार होतात. या घटकांचा सर्वाधिक परिणाम कोलेजनवर होतो, कारण त्वचेमध्ये कोलेजन नाजूक असते आणि त्याची पुनर्निमिती हळूहळू होते. एकदा कोलेजनचे नुकसान झाले की, ते सहजपणे भरून निघत नाही. डॉ. चोप्रा यांचे म्हणणे आहे की, अति साखरेमुळे कोलेजन लवचिक राहण्याऐवजी कडक आणि ठिसूळ बनते, ज्यामुळे त्वचेला आधार देण्याची क्षमता कमी होते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक घट्टपणा, लवचिकता व टवटवीतपणा कमी होतो. अनेकांना वाटते की, वय वाढल्याची पहिली खूण म्हणजे सुरकुत्या, पण डॉ. पूजा चोप्रा सांगतात की, त्याआधीच त्वचेत बदल सुरू झालेले असतात. तिशीच्या मध्यात अनेकांच्या गाल आणि जबड्याचा भाग पूर्वीसारखा उठावदार दिसत नाही. चेहऱ्यावरील त्वचा थकलेली, निस्तेज आणि सैल झाल्यासारखी वाटू लागते. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्वचेतील कोलेजन कमकुवत होणे. ठाण्यातील द स्किन क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वंदिता हेडे यांचे म्हणणे आहे की, साखरेचा गैरसमज आहे की ती फक्त मिठाईत असते. आपल्या रोजच्या आहारातील अनेक पदार्थ नकळतपणे शरीरात मोठ्या प्रमाणात साखर पोहोचवत असतात. गोड चहा, पॅकबंद फळांचे ज्यूस, बिस्किटे, पांढरा ब्रेड, पाव आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ लवकर साखरेमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे दिवसभर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असते. डॉ. हेडे यांचे म्हणणे आहे की, अनेक रुग्ण मिठाई खाणे थांबवतात, पण गोड पेये किंवा प्रोसेस्ड पदार्थ खात राहतात, ज्यामुळे साखरेचे प्रमाण कमी झाले, असा त्यांचा समज चुकीचा ठरतो. मधुमेह नियंत्रणात नसलेल्या लोकांमध्ये साखरेमुळे होणारे त्वचेचे नुकसान अधिक स्पष्टपणे दिसून येते. अशा व्यक्तींच्या जखमा भरून येण्यास जास्त वेळ लागतो. स्किनकेअर प्रॉडक्ट्सच्या मर्यादा आहेत. डॉ. पूजा चोप्रा यांचे म्हणणे आहे की, रेटिनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असलेली उत्पादने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, पण साखरेमुळे आधीच खराब झालेल्या कोलेजनची भरपाई होत नाही. डॉ. हेडे यांच्या मते, महागडे फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट्स करूनही चुकीच्या आहाराचे परिणाम लपवता येत नाहीत. त्वचेचे आरोग्य हे रोजच्या आहार आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असते.



















