Jayakwadi Dam Update: गोदावरीकाठच्या गावांसाठी महत्त्वाची बातमी; जायकवाडीतून विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी

पैठण : जायकवाडी (नाथसागर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक घटली आहे. यामुळे धरण प्रशासनाने गुरुवारी धरणातून सोडण्यात
पैठण : जायकवाडी (नाथसागर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक घटली आहे. यामुळे धरण प्रशासनाने गुरुवारी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला. दुपारी २.३० वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात ४ हजार ३२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग स्थिर ठेवण्यात आला आहे. यासाठी धरणाचे १० दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत, तर उर्वरित ८ दरवाजे अर्धा फूट उचलून नियंत्रित पद्धतीने पाणी सोडले जात आहे. धरणात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे प्रशासनाने विसर्ग कमी करण्याची आवश्यकता भासली आहे. गुरुवारी पहाटे २ वाजता धरणातून १९ हजार २६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, परंतु पाण्याची आवक कमी झाल्याने सकाळी तो ९ हजार ७०२ क्यूसेक करण्यात आला. दुपारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा विसर्ग आणखी कमी करून ४ हजार ३२८ क्यूसेक इतका करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांसाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे.
सायंकाळी ६ वाजताच्या अधिकृत नोंदीनुसार, जायकवाडी धरणात २ हजार १९.१३४ दलघमी (९३.०१ टक्के) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणीपातळी १ हजार ५२०.७२ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. पाणीसाठा समाधानकारक असल्याने मराठवाड्यातील पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. गेल्या तीन तासांमध्ये धरणात सरासरी २१ हजार ४८७ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. तथापि, मागील काही दिवसांच्या तुलनेत आवकेत लक्षणीय घट झाल्याने धरण प्रशासनाने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून ४ हजार ३२८ क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. याशिवाय उजव्या कालव्यातून १ हजार १०० क्यूसेक आणि डाव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी १ हजार १०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातून सध्या एकूण ६ हजार ५२८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.



















