Chilli Market: मिरची उत्पादकांचा 'तिखट' अनुभव; लाखाचा खर्च अन् भाव फक्त २५ रुपये

सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोगांचा वाढता प्रादुर्भाव, मुसळधार पाऊस आणि बाजारातील अचानक घसरणारे
सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोगांचा वाढता प्रादुर्भाव, मुसळधार पाऊस आणि बाजारातील अचानक घसरणारे दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. हंगामाच्या सुरुवातीला पिके वाचविण्यासाठी पाण्याचे टँकर मागवावे लागले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने काढणीच्या काळात मिरचीचे दर अवघ्या दोन दिवसांत ५० टक्क्यांनी घटले आहेत. दोन दिवसांपूर्वी ५० रुपये किलो असलेली हिरवी मिरची आता २५ ते ३० रुपये किलोवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सडलेली आणि दर्जाहीन मिरची केवळ २० ते २५ रुपये किलो दराने खरेदी केली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यंदाच्या हंगामात पाण्याची कमतरता आणि नंतरच्या मुसळधार पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. काढणीच्या काळात पाऊस सुरू राहिल्याने मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काही भागांत मिरचीची झाडे पिवळी-लाल पडत असून, शेतातच मिरची सडत असल्याचे चित्र आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि बाजारात येणाऱ्या मालाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, आमठाणा आणि शिवना या मिरची खरेदीच्या प्रमुख केंद्रांमध्ये दोन दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला ५० रुपये किलो दर मिळत होता. मात्र, अचानक दर घसरून तो आता २५ ते ३० रुपये किलो झाला आहे. अत्यंत चांगल्या प्रतीच्या मालाला प्रतिक्विंटल ३,५०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे सांगण्यात येते. दरातील या अचानक घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. सिल्लोड तालुक्यातील मिरची बाजारपेठेत दररोज मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या १५ ते २० हजार क्विंटल हिरव्या मिरचीची आवक होत असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यातील उत्पादित मिरचीचा मोठा हिस्सा पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या परराज्यांमध्ये पाठविला जातो. परराज्यांमध्ये हिरव्या मिरचीला मागणी असतानाही स्थानिक बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असतानाही शेतकऱ्यांना दराचा स्थिर आधार मिळत नसल्याची तक्रार आहे. दरात अचानक बदल, वजनात तफावत आणि व्यापाऱ्यांकडून दर पाडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दररोज बाजारातील परिस्थिती बदलत असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कोणत्या दराने विकला जाईल, याची खात्री राहत नाही. त्यामुळे उत्पादनाचा खर्च आणि बाजारातून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. मिरची लागवडीसाठी सुरुवातीपासूनच मोठा खर्च करावा लागला. पिके वाचविण्यासाठी टँकरच्या पाण्यावर हजारो रुपये खर्च झाले. त्यानंतर रोग नियंत्रणासाठी औषधांचा खर्च, काढणीची मजुरी आणि वाहतूक खर्चही वाढला. आता मिरचीचा दर २५ ते ३० रुपये किलोवर आल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून टँकरचा खर्च तर सोडाच, साधी काढणी मजुरीही भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मिरची उत्पादकांच्या अडचणींचे मूळ यंदाच्या अस्थिर हवामानातही आहे. सुरुवातीला पावसाअभावी पाण्यावर अतिरिक्त खर्च, त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोग आणि उत्पादनाचे नुकसान, तर आता बाजारातील दरघसरण या तिन्ही संकटांचा एकत्रित परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. एकरी एक लाख रुपयांहून अधिक खर्च करून उभे केलेले पीक आता २५ ते ३० रुपये किलो दराने विकावे लागत असल्याने मिरची उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे बाजारभाव स्थिर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.





















