Sugar Minister's Factory:सहकार मंत्र्यांच्याच कारखान्याने ऊसाची एफआरपी दिली नसेल तर प्रशासन कारवाई करणार तरी कोणावर?

कोल्हापूर : राज्यातील सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी दिली नसल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी
कोल्हापूर : राज्यातील सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी दिली नसल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी शुक्रवारी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी चर्चा करताना प्रश्न उपस्थित केला की, 'जर सहकार मंत्रीच नियमांचे पालन करत नसतील, तर प्रशासन कोणावर कायदेशीर कारवाई करणार?' शेट्टी यांनी थकीत ऊसबिलासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी साखर उद्योगातील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीवर प्रशासनाचे लक्ष वेधले. साखर आयुक्त कार्यालयाला सादर केलेल्या थकीत ऊस बिलाच्या आकडेवारीत मोठा फरक असल्याचे त्यांनी सांगितले आणि अशा कारखान्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले की, राज्यातील साखर कारखान्यांनी सादर केलेली थकीत ऊस बिलाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये मोठा तफावत आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आयुक्त कार्यालयाने याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्य सरकारच्या एफआरपीच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या तीन वर्षांत ज्या कारखान्यांनी दोन ते तीन टप्यांत एफआरपी दिली, त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज तातडीने जमा करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



















