Fraud via Facebook: शेतकऱ्याला ६.३१ लाखांचा गंडा

गुजरातमधील राजकोट येथे फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यामुळे एका शेतकऱ्याची ६.३१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ती
गुजरातमधील राजकोट येथे फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यामुळे एका शेतकऱ्याची ६.३१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे, ज्यामध्ये घाना, टांझानिया आणि दक्षिण सुदानचे नागरिक समाविष्ट आहेत. हे आरोपी सोशल मीडियाद्वारे गिफ्ट पार्सलचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालत असल्याचे सांगितले जात आहे. इंडिया टुडेने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तक्रारदार शेतकऱ्याने फेसबुकवर आलेली एक महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. या महिलेने स्वतःला 'सिंगल मदर' म्हणून ओळख करून दिली आणि तिचं नाव जोसेफिन उर्फ एंजेल आहे. तिने शेतकऱ्याशी मैत्री वाढवली आणि काही दिवसांनी जर्मनीहून भेटवस्तू पाठवण्याचे आश्वासन दिले. तिने सांगितले की, त्या पार्सलमध्ये ३० हजार युरो, सोन्याची साखळी, लॅपटॉप, घड्याळ आणि आयफोन आहे. यानंतर शेतकऱ्याला दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क अधिकारी असल्याचा फोन आला, ज्यामध्ये पार्सल सोडवण्यासाठी सीमाशुल्क आणि इतर शुल्क भरावे लागेल, असे सांगितले. यामुळे शेतकऱ्याने विश्वास ठेवून विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे ६.३१ लाख रुपये पाठवले, परंतु पार्सल कधीच आले नाही. शेतकऱ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने राजकोट सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी सोशल मीडिया खाती, मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप चॅट, बँक व्यवहार, आयपी लॉग आणि इतर डिजिटल पुरावे तपासले. या तपासादरम्यान, पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जोसेफिन, टांझानियाचा म्गेन्जेली इमानी डेनिस आणि दक्षिण सुदानचा फिलिप बॅटिस्टा जोसेफ व्हॅलेंटाईन यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, फसवणुकीसाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेली १५ बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक तपासात दोघे आरोपी विद्यार्थी व्हिसावर, तर तिसरा अल्पकालीन व्हिसावर भारतात आल्याचे समोर आले आहे. तिघांच्याही व्हिसाची मुदत संपलेली असूनही ते भारतातच राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीत सहभागी काही परदेशी नागरिक न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने भारताबाहेर जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे ते अशा गुन्ह्यांमध्ये पुन्हा सहभागी होत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



















