Pandharpur Wari 2026: आळंदीत ‘माऊली - तुकारामांचा' जयघोष

आळंदी: टाळ आणि मृदंगाचा गजर, 'माऊली - तुकारामांचा' जयघोष, विविध वाद्यांचा आवाज आणि रंगोळीच्या पायघड्या यामुळे आळंदीतील वातावरण चैतन्याने भरले होते. शनिवारी, ८ ज
आळंदी: टाळ आणि मृदंगाचा गजर, 'माऊली - तुकारामांचा' जयघोष, विविध वाद्यांचा आवाज आणि रंगोळीच्या पायघड्या यामुळे आळंदीतील वातावरण चैतन्याने भरले होते. शनिवारी, ८ जुलै रोजी, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत अलंकापुरीत विसावला. ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले होते. माऊलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेप्रमाणे चोपदारांकडून 'सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी' या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन स्वागत केले. त्यानंतर नगरपालिका चौक, श्रीविष्णू मंदिर, श्रीराम मंदिर आणि हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखी महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणा मंडपात पालखी स्थिरावली.
पालखीतील 'श्रीं'च्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थांनतर्फे माऊलींची आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे 'पिठलं - भाकरीचा' महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली. परंपरेनुसार चक्रांकित महाराजांच्यावतीने पिठलं- भाकरीचा प्रसाद वाटून अशा मंगलमय दिनाची सांगता करण्यात आली. आळंदीत माउलींना घेऊन येण्यासाठी भर पावसात स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे तसेच शहरातील अन्य शाळांमधील विद्यार्थी व भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला.





















